आज नेहमी "मराठी माणूस, मराठी माणूस" असे ऎकायला मिळते. परंतु मराठी माणूस खरच त्या मानाने जागा झाला आहे का हे सुध्दा पाहायला हवे ना! जरा आपल्या आजुबाजूला नजर टाकून बघा की काय चालले आहे ते! मराठी माणसाची एकच समस्या आहे की तो अजुनही संघटीत होऊन कामे करत नाही. एक म्हण मला आवर्जुन इथे सांगावीशी वाटते ती म्हणजे "गाव करील ते राव काय करील". दुसरा जर पुढे जात असेल तर त्याचे पाय ऒढू नये ही सर्वसामान्य गोष्ट सुध्दा आपल्याला सांगावी लागते. मला तर एक पटते, आपण जर पुढे जाऊ शकत नाही तर दुसरा जे काय करतो आहे त्याला तरी खाली खेचू नये. उलट त्याला आपल्या परीने मदत करावी. पण आपण तेवढे पण करत नाही. नोकरीच्या मागे लागणे की न लागणे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
आपल्याला नोकरीच्या फ़ॉर्मची माहिती असेल तर ती दुसऱ्यांना सुध्दा द्यावी. आपल्या लोकांसाठी आपण एवढे तरी करू शकतो.
परंतु जर मराठी माणसाने व्यवसायाच्या मागे लागले तर आपली स्वप्ने का पूर्ण होणार नाहीत. मला माहित आहे मध्यमवर्गीयांच्या समस्या. कारण मी सुध्दा एक मध्यमवर्गीयच आहे. व्यवसाय सुरू करायचा म्हटला म्हणजे भांडवलाचा यक्षप्रश्न हा भेडसावणार आहे. आपल्याला याच ठिकाणी तर संघटीत व्हायचे आहे. आज बेरोजगारांची एक समस्या निर्माण झाली आहे. पदवी असून फ़ायदा नाही. नोकरीसाठी पैसा, वशिला, शिक्षण या त्रिसुत्रींची गरज असते. त्यामुळे आजचे तरूण नोकऱ्यांसाठी अर्ज करतात आणि त्यात त्यांचे अर्धे वय निघून जाते. मग लग्न, मुले या गोष्टी तर बाजुलाच राहतात. पण आपल्या तरूणांना व्यवसाय करण्याची बुध्दी सुचतच नाही. त्यांना फ़क्त एकच गोष्ट सुचते, कट्ट्यावर बसून आपल्या मुलांना नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही, आपले सरकार निष्क्रीय आहे. परंतु आपल्या आजुबाजूला जे दुकाने टाकून बसले आहेत. ते त्यांना दिसत नाही.
आपण आपल्या राजकारणाला हातभार लावू शकत नाही तर त्याला आपल्याकडून जेवढी होईल तेवढी मदत तर निश्चितच करायला हवी. हे माझे स्पष्ट मत आहे. यासाठी जागे व्हा, संघटीत व्हा.